2021-08-24 20:24:00
आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष
२४ ऑगस्ट इ.स.१६५७
महमद आदिलशहा १६५६ त मरण पावल्यानंतर त्याच्या पत्नीने बेगम साहेबिणीने आपल्या पसंतीच्या तरण्या मुलाचे अली नाव ठेवून त्यास विजापूरच्या गादीवर बसविले. तो एकोणीस वर्षांचा होता. खरा कारभार त्याची आई साहेबीण पाहू लागली. मोऱ्यांचा निकाल छत्रपती शिवाजीराजांनी लावल्यापासून विजापूर दरबारावर संकटांची मालिका कोसळू लागली. औरंगजेबाने विजापूरवर आक्रमण करून त्यांना राज्य वाचविण्यासाठी मोगलांशी तह करण्यास भाग पाडले. त्याप्रमाणे २४ ऑगस्ट १६५७ रोजी आदिलशहाने औरंगजेबाशी तह केला. त्यात कल्याणी, परिंडा व त्याभोवतालचा भाग, निजामशाही कोकणातील किल्ले, वांगणी परगणा व खंडणीदाखल दीड कोटी रुपये द्यावेत अशा तहातील मुख्य अटी होत्या. दिल्लीला बादशहा शहाजहान आजारी पडल्याची बातमी औरंगजेबास समजली म्हणून औरंगजेबाने आपली दक्षिणेकडील मोहीम आटोपती घेतली व त्याने सरळ दिल्लीची वाट धरली. इकडे बड्या साहेबिणीने विजापूर दरबार भरविला आणि त्यांत छत्रपती शिवाजीराजांच्या पारिपत्याचा विचार केला. छत्रपती शिवाजी राजांना शासन करावे हे दरबारांत ठरले व ही कामगिरी धिप्पाड अफगाण सरदार अफझलखान याजवर सोपविण्यात आली.
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
२४ ऑगस्ट इ.स.१६७५
ऑस्टीनबरोबर महाराजांस व त्यांच्या मंत्र्यास देण्यासाठी म्हणून सातशे चाळीस रुपये किमतीच्या भेटी होत्या. दिनांक २४ ऑगस्ट १६७५ रोजी त्याने मुंबई सोडली व दिनांक ६ सप्टेंबर रोजी तो रायगडावर दाखल झाला. त्याची महाराजांशी मुलाखत १५ तारखेला रात्री प्रल्हाद निराजींच्या मध्यस्थीने झाली. ऑस्टीनला सांगण्यात आले की धरणगावबाबत तुम्ही सांगत असलेल्या हकीगतीपैकी कोणतीही हकीगत महाराजांच्या कानी आलेली नाही. तेव्हा जी नुकसानभरपाई मागत आहात ती निरर्थक आहे. त्यानंतर ऑस्टीनने कंपनीच्या वखारीसाठी कौल (अभय) मागितला. त्यावर फार चिकित्सा होऊन महाराजांनी तो देण्यासाठी हुकुम दिला.
२४ ऑगस्ट इ.स.१६७७
मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना पाठविलेल्या पत्राची नोंद!
आपली दक्षिण दिग्विजय मोहीमेत शिवाजी महाराजांनी विजापुरकरांचा बराचसा मुलुख आणि कावेरी नदीच्या उत्तर भागातील असा मिळून १९ हजार चौरस मैलांचा अतिशय सुपीक भाग जिंकला. त्याचा वार्षिक महसूल २० लाख होनापेक्षाही जास्त होता. महाराज यानंतर उत्तर कर्नाटकात आले.त्याबद्दलची इंग्रजांची नोंद,"शिवाजी सध्या ऊर्ध्व कर्नाटकात,जेथे जिंजी,तंजावर,पिलकुंडा हे मजबूत व अन्य अनेक किल्ले त्याने घेतले असून मुसलमानांचा लज्जास्पद पराभव त्याने केला आहे आणि त्याने श्रीरंगपट्टण लुटले आहे असे मानले जाते. तेथून त्याने प्रचंड संपत्ती सोबत नेली असे म्हणतात. परतताना ब्रिदरूर घेण्याचे व त्याद्वारे कॅनरा प्रांत नव्याने जिंकलेल्या त्याच्या राज्याला जोडण्याचे त्याचे नियोजन आहे.
२४ ऑगस्ट इ.स.१६८०
(भाद्रपद शुद्ध १०, दशमी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार मंगळवार)
संभाजीराजांचे दानपत्र!
संभाजीराजांनी कुडाळ येथील रहिवासी बाकरेशास्त्री यांना प्रतिवर्षी दहा हजार होनांचे दानपत्र करून दिले. हे दानपत्र संस्कृतमधे असुन त्यातील अक्षर सुंदर आहे तसेच, सुरूवातीला शंकरादी देवांना वंदन करून पुढच्या दोन ओळी स्वतः संभाजीराजांच्या हस्ताक्षरातील आहेत त्या पुढीलप्रमाणे:
।। मतं मे श्रीशिवराजपुत्रस्य श्री शंभुराज।।
।।छत्रपते: यदत्रोपरिलेखितं।।
अर्थ: यापुढे मी जे लिहिले आहे ते शिवाजीराजांचा राजपुत्र असलेल्या मला (संभाजीराजांना) संमत आहे.
या वेळेपर्यंत अजुन संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला नव्हता. तो त्यांनी पुढे पाच महिन्यांनी करवून घेतला. शिवाजीराजे साधुसंतांना इनाम करून देत असत त्याप्रमाणेच हे दानपत्र संभाजीराजांनी कुडाळच्या बाकरेशास्त्री या मांत्रिकाला दिले. हे दानपत्र खुप मोठे आहे. त्यात काही ठिकाणी संभाजीराजांनी काही लोकांचे उल्लेख केले आहेत ते महत्त्वाचे आहेत. ते पुढीलप्रमाणे-
*शिवाजीराजांच्या पराक्रमाचे केलेले वर्णन
*शिवाजीराजांनी अफजलखानाला मारताना बिचवा हे शस्त्र वापरले
*सोयराबाईंचे मन हे स्फटिकमण्याप्रमाणे स्वच्छ आहे मात्र प्रबळ व दुष्ट मंत्र्यांच्या सल्ल्यामुळे सोयराबाईंच्या मनात सापत्नभाव तयार झाला आहे आणि त्यामुळे शिवाजीराजेही त्यांच्या पित्रुकर्तव्याला चुकले आहेत.
*औरंगजेबाच्या सेनापतीने (दिलेरखान) भुपाळगड जिंकुन देण्यासाठी संभाजीराजांपुढे हात टेकले
हे वरील उल्लेखांबरोबरच संभाजीराजांनी स्वतःच्या व शिवाजीराजांचे पराक्रम, तसेच देवांची स्तुती अलंकारित भाषेत वर्णिली आहे.
या दानपत्रातुन संभाजीराजांच्या मनात स्वतः विषयी व शिवाजीराजे, सोयराबाई, मंत्रीगण, औरंगजेब व इतर शत्रूंबद्दलचे विचार व्यक्त होतात.
24 views17:24