आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष १९ जुलै इ.स.१६४७ महादभट | " छञपती श्री शिवाजी महाराज "
आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष
१९ जुलै इ.स.१६४७
महादभट मुद्गल पुरंदरे यांनी शिवाजीमहाराजांकडे येऊन सांगितले की, मला पर्वती, पिंपळे सौदागर आणि पिंपरी या प्रत्येक गावात एक एक चावर जमीन याप्रमाणे तीन चावर जमीन आणि पुणे परगण्याच्या जकातखात्यातून दिवाबत्तीकरिता रोज तीन रुके असे इनाम आहे. हे इनाम निजामशाही फर्माने, मलिकअंबराचे खुर्द्खत, वाजीरांनी दिलेली भोगवट्याची पत्रे आणि शहाजीराजांनी दिलेले खुर्दखत यांच्याप्रमाणे शुहूर सन १०४७ पर्यंत चालले आहे. यावर्षी सुभेदार दादाजी कोंडदेव यांना देवाज्ञा झाली म्हणून महालीचे कारकून नवीन खुर्दखत आणा असा आक्षेप घेतात. तरी कृपा करून हे इनाम चालू ठेवण्याची आज्ञा व्हावी.
हि सर्व विनंती शिवाजीमहाराजांना या पत्रात उद्धृत केली आहे आणि गतवर्षीपर्यंत ज्याप्रमाणे हे इनाम चालत आले आहे, त्याप्रमाणे पुढे हि चालू ठेवावे असा हुकुम केला आहे.
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
१९ जुलै इ.स.१६५९
(श्रावण शुद्ध दशमी, शके १५८१, संवत्सर विकारी, वार मंगळवार)
महाराजांचे राजकारण!
औरंगजेबाने शिवरायांना पाठवलेले पत्र व पोशाख शिवरायांना प्राप्त झाला. विजापुरात मोहीमेच्या तयारीची लगबग सुरु झाली होती, अगणित संप्पत्ती अंदाजे चाळीस हजारांवर फौजफाटा अशा तयारीनिशी खान आपला मुलगा फाजलखानासह निघाला. "तेजस्वी ओजस्वी प्रखर सुर्याचं "शिवाजी महाराजांच" अस्तित्व मिटवायला". स्वराज्याच्या गुप्तहेरांनी विजापुरची खडानखडा माहिती महाराजांपर्यत पोहचवण्याची कामगिरी चोख पार पाडली होती.
१९ जूलै इ.स.१६५९
गोव्याच्या किल्ल्यातील दालनात वाचले गेलेले शिवाजी महाराजांचे पत्र-
शिवाजीराजांचे दंडयाच्या सिद्दी व त्या बंदरातील हबशी (सिद्दीची प्रजा) यांच्याशी वितुष्ट आहे. शिवाजीराजांनी आपल्या सरहद्दीवर (सिद्दी विरुद्ध) काही घोडेस्वार व प्यादे पाठवले होते. तेव्हा चौल व वसई येथील कॅप्टन सिद्दीला रसद पुरवीत होते आणि सर्व प्रकारची मदत करीत होत.
ह्या (गोवा पोर्तुगीज) राज्यासी असलेल्या शिवाजीराजांच्या मैत्रीला हि गोष्ट अत्यंत बाधक आहे.
चर्च नंतर सल्लागार मंडळातील सभासदांनी एकमताने निर्णय घेतला की, त्यांनी (चौल व वसई येथील कॅप्टन) दंडयाच्या हबस्याला मदत करू नये, परंतु गुप्त पणे व कोणालाही समजणार नाही आणि शिवाजीराजांना सुगावा लागणार नाही अश्या प्रकारे मदत केल्यास हरकत नाही, असे पत्र लिहावे.
१९ जुलै इ.स.१६९४
परंड्याचा किल्ला म्हणजे दारूगोळ्याचे भांडार
प्राचीन काळापासून परंडा किल्ला परगणा म्हणजे जिल्ह्याचे ठिकाण असून बहामनी काळात ख्वाजा जहान तर आदिलशाहीत गालीब खान हे किल्लेदार राहिले आहेत. पुढे १६५७ साली मोगलांनी परंडा जिंकून घेतल्यानंतर मीर महंमदखान आणि इज्जतखान हे किल्लेदार होते. पैकी १९ जुलै १६९४ च्या एका पत्रानुसार किल्लेदार इज्जतखानाने किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ इज्जतपुरा नावाने नवीच वस्ती वसविली होती. त्याच्याच काळात परंडा किल्ल्यात रोगाची साथ पसरल्याची नोंद आहे. मध्ययुगीन कालखंडात परंड्याप्रमाणे नळदुर्ग हा जिल्हा असला तरी नळदुर्गमधील किल्ल्यातल्या एका बुरुजाला परंडा बुरूज हे नाव आहे. परंड्याच्या किल्ल्यात भरपूर युद्धसामग्री साठवून ठेवलेली होती.
१९ जुलै इ.स.१७३९
वसईच्या पाडावानंतर पोर्तुगीज सैन्याला आणि त्यांच्या बायकामुलाना मराठ्यानी गोव्यास जाऊ दिले. परंतु गोव्यातील मराठा सैन्य अजून तिकडे रेंगाळत मागे राहिले होते. ते १७३९ सालच्या मे अखेर माघारा परतू लागले. व्यंकटराव घोरपडे यानी साष्टी प्रांतातून सैन्य २१ मेस काढून घेतले. तत्पूर्वी रायतूरचा वेढा त्यानी १२ मेस उठविला होता. साष्टी प्रांतातील मराठा सैन्य माघारा परतले, तरी व्यंकटराव घोरपडे त्या सैन्याबरोबर गेले नाहीत. ते सांगे येथे जाऊन राहिले. दाजीराव भावे नरगुंदकर कुकळ्ळीला ठाण मांडून राहिले होते. पोर्तुगीजांकडून ते आणखी काही उपटण्याची अपेक्षा करीत होते. ती रक्कम मिळाल्याखेरीज ते मडगावहून सैन्य हलविणार नाहीत ह्याची जाणीव होताच पोर्तुगीजानी त्यांच्या हातावर देऊ केलेली रक्कम ठेवून त्याना मडगावचा कोट खाली करावयास लावला. दि. १९ जुलै १७३९ या दिवशी पोर्तुगीजानी मडगावच्या कोटाचा ताबा घेतला. परंतु त्यानी तो लगेच पाडून जमीनदोस्त करून टाकला. कुकल्ली गाव, तेथील कोट आणि असोळणे गाव श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्याच्या आज्ञेवरून पुढे आणखी काही दिवस मराठ्यांच्या ताब्यात होते. बाजीराव आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये तहाच्या वाटाघाटी चालू असता इ. स. १७४० च्या मार्च महिन्यात फोंड्याच्या मराठा सुभेदाराने साष्टी प्रांताच्या महसुलापैकी चाळीस टक्के महसूल वसूल करण्यासाठी पाचशे घोडेस्वार आणि सहाशे पायदळ पाठवून तिकडे लुटालूट केली.